सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याचं प्रतिबिंब “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहात दिसत आहे:प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे

सावंतवाडीशी माझं नातं वेगळं आहे. कवीवर्य वसंत सावंत, बा. भ. बोरकर यांच्यासह येथील टी एन नाईक, दीनकर धारणकर, तात्या भांगले, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, विद्यार्थी महेश केळुसकर, आदींसह मी या भूमीत काम केलं. असे सांगत सावंतवाडीमध्ये एस.पी. के. महाविद्यालयात नोकरी करत असताना घालवलेल्या १७ वर्षांच्या आठवणी प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे यांनी जागृत केल्या. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पुढे बोलताना “सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याचं प्रतिबिंब बकुळीची फुले या काव्यसंग्रहात दिसत आहे” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. जुन्या कवींच्या खांद्यावर उभे राहून नवे कवी जग पाहत आहेत. कविता लिहिणं हे वाटते तेवढी सोप्पी गोष्ट नाही. शब्दांना आपल्या मुठीत पकडण्याचं काम कवी करतो. जगाच्या इतिहासात काव्य हे पहिलं लिहिलं गेलं असून कवितेचा अन् मानवी जीवनाचा संबंध दृढ आहे. असे सांगत “छंदमुक्त कवितेच्या वातावरणात वृत्तबद्ध काव्य लिहिणाऱ्या दीपक पटेकर यांचा गौरव करायला हवा” असे कवी दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी साहित्यिक प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे म्हणाले. आपल्या मनोगतात त्यांनी कवी वसंत सावंत यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आणि कविता म्हणजे काय? ती कशी लिहावी, कशी असावी? याबाबत अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आणि मुक्तच्छंदच्या नावावर छंदमुक्त कविता लिहितात यावर मार्मिक भाष्य केलं.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” या वृत्तबद्ध काव्यसंग्रहाचं प्रकाशन प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ एच व्ही देशपांडे (माजी प्राचार्य आजरा महाविद्यालय) यांच्या हस्ते व मालवणी कवी विनय सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीतील प्रसिद्ध केशवसुत कट्ट्यावर थाटात पार पडले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा, कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, प्रसिद्ध साहित्यिका सौ उषा परब, कवी दीपक पटेकर, भरत गावडे, अनिल भोसले, पटेकर कुटुंबीय आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत व परिचय भरत गावडे यांनी करून दिला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.जी. ए. बुवा यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे यांचा शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. तर कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते अध्यक्ष मालवणी कवी विनय सौदागर यांचा शॉल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन गौरव केला. व्यासपीठावर उपस्थित डॉ. जी. ए. बुवा व साहित्यिका सौ.उषा परब, मंगेश मसके यांचाही कोमसाप सावंतवाडी शाखेकडून राजू तावडे, अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचे पुस्तक भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना कवी दीपक पटेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व आपल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला झालेल्या गर्दीसमोर नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी पुस्तक निर्मितीसाठी प्रेरणा देणारे आपले वडील, काव्यगुरू विजय जोशी (विजो), प्रेरणास्थान मार्गदर्शक जी. ए. बुवा, पुस्तक निर्मितीसाठी मदत करणारी आपली बहीण अपर्णा जाधव आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कोमसाप शाखेच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. पुढे बोलताना त्यांनी मुक्तच्छंद कवितेकडून वृत्तबद्ध कवितांकडे कसे वळलो हे सांगून पुस्तकाचा संपूर्ण प्रवास वर्णन केला.

*”पटेकर यांच्याकडे यमकांची विपुलता असून एक गीतकार त्यांच्यात दडलेला आहे: अध्यक्ष कवी विनय सौदागर”*

पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष कवी विनय सौदागर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. साहित्यात कवितेला महत्त्व असून गद्य लेखनापेक्षा अंतरी असते ते कवी थेट कवितेत मांडू शकतो. दीपक पटेकर यांच्यातील कवी आम्ही अनुभवला आहे. सोप्या शब्दात कवितेची मांडणी त्यांनी केली आहे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद कवितेत आहे. यमकांची विपुलता पटेकर यांच्या लेखनात असून त्यांच्यात एक गीतकार दडलेला आहे. निसर्ग, प्रेमासह सामाजिक काव्य त्यांनी लिहिलं असून त्यांचे मनोगत देखील काव्यात्मक आहे. त्यांच्या कवितांवरचा “कवितेचा दीपक” हा कार्यक्रम यापूर्वीच घेऊन आम्ही त्यांचा सन्मान केला आहे असेही ते आपल्या मनोगतात म्हणाले.

दादा मडकईकर, अनिल भोसले, संतोष वालावलकर, संतोष सावंत, एकनाथ कांबळे, मुकूंद वझे, श्री. भाट, प्रा. सुरेश म्हसकर, प्रा. धीरेद्र होळीकर, सतीश पाटणकर, मधुकर मातोंडकर, श्री दिलीप भाईप, दयानंद गवस, विनायक पराडकर, जितू पंडित, विठ्ठल कदम, प्रदीप प्रियोळकर सर, संदीप सावंत, व्ही.के.सावंत, वैशाली सावंत, डॉ.सुनील परब, आदिती मसुरकर, धोंडी मसुरकर, स्नेहा नारिंगणेकर, धोंडू नारिंगणेकर, प्रीतम तिवरेकर, वैभवी हरमलकर, नकुल पार्सेकर, राजा घाटे, रमेश बोंद्रे, अनंत वैद्य, राजू तावडे, अभिमन्यू लोंढे, रवी जाधव, कल्पना बांदेकर, अरूण पणदुरकर, भरत गावडे, प्रा‌.रूपेश पाटील, प्रा. केदार म्हसकर, कल्पना बोडके, साबाजी परब, राजेश नाईक, प्रा. गोडकर, प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, बाळकृष्ण राणे, डॉ. दीपक तुपकर, रामदास पारकर, ऋतुजा सावंत भोसले, मेघना राऊळ, अभिमन्यू लोंढे, सुभाष गोवेकर, मोहन जाधव, प्रशांत कासकर, संदीप कांदे, शेखर जाधव, नेपोलियन डिसोझा, किशोर वालावलकर, म. ल. देसाई, सुरेश पवार, सौ.आश्लेषा पारकर, विनीता सातार्डेकर, सुमती कासकर, विघ्नेश सातार्डेकर, मिहिर कासकर, नूतन पावसकर, महेश खानोलकर, परेश परब, प्रसाद परब, वैभव पारकर, सौ.सौदागर, सौ. पूजा पटेकर, सौ.मोहिनी पटेकर, श्री.परशुराम पटेकर, भूमी पटेकर आदी कुटुंबीय, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्यांकडून कवी दीपक पटेकर (दीपी) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव विनायक गांवस यांनी केले तर आभार सचिव राजू तावडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page