पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद
पुणे प्रतिनिधी
पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत, त्यांनी देशभरातील पत्रकारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “पत्रकार सुरक्षित तर लोकशाही मजबूत” हा संदेश देत ही चळवळ आता निर्णायक संघर्षाच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. संघटनात्मक बांधणीतून पुण्यात आता ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेची मोठी ताकद उभी राहिली आहे.
देशातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेली ‘पत्रकार सुरक्षा परिषद’ अत्यंत उत्साहपूर्ण, विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक ठरली. पत्रकारांचे अधिकार, हक्क आणि बदलत्या मीडिया व्यवस्थेतील आव्हाने यांवर या परिषदेत सखोल मंथन करण्यात आले. राज्यभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभाग नोंदवत आपले अनुभव आणि अडचणी मांडल्या. त्यामुळे ही परिषद केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता वास्तववादी संवादाचे एक प्रभावी व्यासपीठ ठरली.
या परिषदेला प्रमुख उपस्थिती लाभलेले संदीप काळे यांनी पत्रकारांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घेतल्या. विशेषतः बातमी देताना येणारा राजकीय व स्थानिक दबाव, खोटे गुन्हे दाखल होण्याच्या घटना, कायदेशीर संरक्षणाचा अभाव आणि आर्थिक असुरक्षितता यांवर पत्रकारांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागातील पत्रकारांनी साधनसुविधांचा अभाव आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांकडून होणारा त्रास विशद केला, तर शहरी पत्रकारांनी डिजिटल स्पर्धा आणि फेक न्यूजच्या प्रभावावर भाष्य केले.
या सर्व मुद्द्यांवर भाष्य करताना संदीप काळे यांनी ठाम भूमिका मांडली. पत्रकारांच्या हक्कांसाठी पुण्यात लवकरच एक सक्षम आणि प्रभावी ‘कोअर कमिटी’ स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. ही कमिटी स्थानिक पातळीवर पत्रकारांचे प्रश्न हाताळेल, प्रशासनाशी समन्वय साधेल आणि कोणत्याही संकटाच्या वेळी तत्काळ धावून येईल. या कमिटीसोबत स्वतः सक्रियपणे कार्य करण्याची तयारी दर्शवत काळे यांनी प्रत्येक पत्रकाराच्या सन्मानासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. “विखुरलेल्या स्वरूपात लढण्यापेक्षा एकजुटीने आवाज उठवला तरच शासन आणि प्रशासनावर प्रभाव निर्माण होऊ शकतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. शोएब अंसारी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे अधोरेखित केले. त्यानंतर अझहर बाबा कादरी यांनी संघटनेचा सविस्तर परिचय करून देत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असलेल्या कार्याची, प्रशिक्षणाची आणि कायदेशीर मदतीची माहिती दिली. परिषदेच्या समारोपप्रसंगी उस्मान कादरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या परिषदेमुळे पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येत्या काळात पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक संघटित आणि प्रभावी लढा उभारला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रसंगी युसुफ जकाती, मनोज खोपडे, दिनेश वढणे, वाजिद खान, मेहबूब सर्जेखान, रियाज मुल्ला, मुझम्मील शेख, सलीम मोमिन, राज राठोड, सुनीत जैनजंडे, सलीम शेख, हबीब शेख, अमित मुंडिक, शहीद मोमिन, अर्शद तामकर यांच्यासह अनेक पत्रकार विशेष उपस्थित होते.
——————
फोटो ओळ: पुण्यात आयोजित करण्यात आलेली ‘पत्रकार सुरक्षा परिषद’ अत्यंत उत्साहपूर्ण, विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक ठरली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी मार्गदर्शन केले.
————-
