पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी तातडीने लक्ष द्यावे:सौ.सावित्री पालेकर
आंबोली प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे आंबोली परिसरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गेल्या सात-आठ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी ग्रामस्थांचे मोबाईल बंद पडले असून अनेक ठिकाणी मोबाईल टॉवरही कार्यरत नसल्याने संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
याचा फटका घरगुती गॅस वितरणालाही बसत असून, ओटीपी प्राप्त होत नसल्यामुळे गॅस एजन्स्यांकडून सिलिंडरचे वितरण होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर आंबोलीच्या प्रशासक सौ.सावित्री पालेकर यांनी विशेष बाब म्हणून ओटीपीची अट शिथिल करून गॅस सिलिंडरचे वितरण करण्याची मागणी केली आहे. तसेच या गंभीर समस्येकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
