नितेश राणेंनी वाढवण बंदरातील नोकऱ्यांचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणेंनी घोषणा केलेल्या रेडी बंदरातील नोकऱ्यांचे काय झाले? हे सांगावे

माजी आमदार वैभव नाईक यांचा राणेंना सवाल

कणकवली प्रतिनिधी
मंत्री नितेश राणे यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार अशी घोषणा केली आहे. मात्र ५०० किलोमीटर दूर असलेल्या वाढवण बंदरात सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगाराचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणे यांनी बंदर विकास मंत्री असताना रेडी बंदर विकसित करून रेडी बंदराच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना नोकरी देण्याच्या केलेल्या घोषणेचे काय झाले, राणे ती घोषणा कधी पूर्ण करणार हे त्यांनी आधी सांगावे. कि रेडी प्रमाणेच वाढवण बंदरातील नोकऱ्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणार आहात का? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

बंदर विकास मंत्री असताना नारायण राणे यांनी २००९ मध्ये खाजगी तत्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदर विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी राणेंनी भागीदारी करून जॉन अर्नेस्ट या खाजगी कंपनीसोबत ५० वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. आणि हजारो लोकांना या रेडी बंदराच्या माध्यमातून नोकरी देण्याचे आमिष नारायण राणेंनी त्यावेळी दिले होते. मात्र राणेंच्या भागीदाराने दरवर्षी साधारण २५ कोटी इतका नफा मिळविला आणि शासनाला करापोटी केवळ अडीच कोटी रु. जमा करून शासनाची फसवणूक केली. सामंजस्य कराराप्रमाणे राणेंच्या भागीदाराने टप्प्याटप्प्याने रेडी बंदर विकसित करणे अपेक्षित होते. आणि ९
जेटींसह इतरही मोठे प्रकल्प येथे राबवायचे होते. मात्र सामंजस्य कराराचेही उल्लंघन करत राणेंच्या भागीदाराने रेडी बंदराचा कोणताच विकास केलाच नाही. त्यामुळे हजारो लोकांना या रेडी बंदराच्या माध्यमातून नोकरी देण्याची राणेंची घोषणा फोल ठरली. मात्र रेडी बंदराच्या माध्यमातून करोडो रुपयांचा फायदा नारायण राणे आणि त्यांच्या भागीदाराला झाला.आता तशाच पद्धतीने नारायण राणेंचे चिरंजीव मंत्री नितेश राणे यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या माध्यमातून ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार अशी घोषणा केली आहे. मात्र ५०० किलोमीटर दूर असलेल्या वाढवण बंदरात सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगाराचे आमिष देत असाल तर आधी रेडी बंदराचे काय झाले हे राणेंनी सांगावे,रेडी बंदराच्या माध्यमातून तरुणांना नोकरी देण्याचे दिलेले अमिष राणे कधी पूर्ण करणार? कि रेडी प्रमाणेच वाढवण बंदरातील नोकऱ्यांचे केवळ अमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणार? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page