कुडाळ एसीबी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा.अरविंद सावंत,आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

कुडाळ येथील ॲड.सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद

कुडाळ प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांसमवेत कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला होता. जमावबंदी आदेशाचा भंग करत आणि रीतसर परवानगी न घेता मोर्चा काढल्याने अरविंद सावंत, भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(ब), ३७(३) सह कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून अरविंद सावंत, भास्कर जाधव यांच्यासह अरुण दुधवडकर,संदेश पारकर, सतीश सावंत, गौरीशंकर खोत,जान्हवी सावंत,अमित सामंत,इर्शाद शेख, राजन नाईक,संतोष शिरसाट,अभय शिरसाट,अतुल बंगे यांची दिवाणी न्यायाधिश जी. ए. कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page