न्यूनगंड सोडून आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जा! प्रा.रुपेश पाटील. ‘

‘मराठी भाषा संवर्धन व करिअरच्या संधी’ विषयावर व्याख्यान संपन्न.

आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय मराठी’चा जागर!

सावंतवाडी : जर आपल्याला इंग्रजी बोलता येत नसेल तर अजिबात मनात न्यूनगंड बाळगू नका. कारण अनेक विदेशी लोकांना देखील इंग्रजी बोलता येत नाही. मात्र ते आपल्या बोलीभाषेचा अधिकाधिक वापर करून जीवनात यशस्वी होतात. म्हणून आपल्या शालेय जीवनात कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जा, यश नक्की मिळेल!, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
शहरातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ‘मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन आणि करिअरच्या संधी’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा धुरी, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा. जोसेफ डिसिल्व्हा , प्रा.महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे, प्रा. डॉ. अजेय कामत, प्रा. रणजीत राऊळ, प्रा. पवन वणवे, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. रणजीत माने, प्रा केदार म्हसकर, प्रा निलेश कळंगुटकर, प्रा. राहुल कदम, प्रा. स्पृहा टोपले, प्रा. पूनम वाडकर, प्रा. दिपा मोरजकर, प्रा. स्मिता खानोलकर, प्रा. प्रांजल वाडकर, विधिता गवंडे, प्रा. माया नाईक यांसह अन्य उपस्थित होते.

दरम्यान प्रा. रुपेश पाटील आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, भारतात २०११ च्या जनगणनेनुसार तब्बल १९ हजार ५०० पेक्षा अधिक मातृभाषा बोलला जातात. त्यात मराठी देखील मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. मराठी भाषेचे संवर्धन करणे काळाची गरज असून महाविद्यालयीन जीवनात मराठी भाषा घेऊन अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. यात उच्च शिक्षण घेऊन नेट – सेट सारख्या परीक्षा देऊन महाविद्यालयीन अर्थात विद्यापीठ स्तरावर प्राध्यापक म्हणून मानाची नोकरी मिळवता येते. तसेच विपुल व अभ्यासपूर्ण लेखन करून लेखक होऊ शकतो. तसेच पत्रकारिता क्षेत्रातही न्यूज रिपोर्टर, अँकर सब एडिटर, आकाशवाणीतही उद्घोषक तसेच प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, मराठी भाषांतरकार, कोर्ट, सरकारी कार्यालये, मंत्रालय, विविध कंपन्या तसेच विविध मीडियांमध्ये कंटेंट रायटर, डिजिटल मीडिया वेबसाईट कंटेंट, युट्युब स्क्रिप्ट रायटर, मराठी ब्लॉगिंग, चित्रपट व मालिका लेखन यांसारख्या अनेक क्षेत्रात मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत करून करिअरच्या संधी आहेत. हे सांगून प्रा. पाटील यांनी आपल्या जीवनातील मराठी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अधोरेखित केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी आंतरसंवाद साधून त्यांना साध्या सोप्या भाषेत मराठी भाषेचे करिअर कसे करता येईल, हे देखील स्पष्ट केले.

मुख्याध्यापिका सौ. कशाळीकर म्हणाल्या, मराठी भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगणे व व्यवहारी जीवनातही जास्तीत जास्त मराठीचा वापर करून आपली मराठी अस्मिता जागृत ठेवून ठेवणे काळाची गरज आहे.

उपप्राचार्य प्रा. डॉ. सुमेधा धुरी यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करत कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ ही कविता सुमधुर स्वरात विद्यार्थ्यांसमोर सादर करून अंतर्मुख केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्याख्याते प्रा. रुपेश पाटील तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले कोकण दर्शन डिजिटल मीडियाचे संपादक आनंद धोंड व व्हिडिओ जर्नालिस्ट आशिष धोंड यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान विद्यालयातील वेदिका राऊलळ, सृष्टी जाधव, ऋतुजा लातये, दिशा गावडे, तेजश्री कुंभार, ऋतिका पिकुळकर, खुशी साटेलकर, सायली गावडे, विभावरी परब, नीरजा जाधव यांनी सुमधुर स्वरात मराठी गीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

कु. रेश्मा संदेश पालव हिने मराठी भाषेची महती विषद करून उत्कृष्ट वक्तृत्व सादर केले. तसेच किरण आकेरकर, भावना माळकर, साईश सावंत, आदेश खानोलकर यांनी देखील मराठीचे महात्म्य आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीतून प्रकट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष पाथरवट यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले. शेवटी प्रा. प्रज्वला कुबल यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page