कणकवली प्रतिनिधी
समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्मृतिदिन कार्यक्रम कै. श्रीधरराव नाईक फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता कै. श्रीधरराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १०.०० वाजता कणकवली शहरातील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
“त्यांचे व्यर्थ न हो बलिदान” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाद्वारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या कार्याचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा जागर करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासह शेतकरी सन्मानाचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी खासदार विनायक राऊत,ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, मुंबई माजी नगरसेवक अरुण दुधवडकर, बाळा भिसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर आदि उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. कै. श्रीधरराव नाईक फाउंडेशनतर्फे सर्वांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
