महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये होणार सहभागी: मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाच्या वर्षी खराब हवामान व अवकाळी पाऊस यामुळे आंबा व काजू पिकांचे फार मोठे नुकसान झाले. याकरिता जिल्ह्यातील सर्व आंबा काजू बागायतदार यांनी महाराष्ट्र शासनाकडे कधी नव्हे ती मदत मागितली परंतु अनेक निवेदने व मागणी करून सुद्धा शासनाने कडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने आंबा काजू बागायतदार यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत पहिल्यांदा मुंबई गोवा महामार्ग व त्यानंतर मुंबई मुख्यमंत्र्यांचा बंगला याठिकाणी आंदोलनही केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये शासनाने आंबा काजू नुकसान भरपाई पोटी तुटपूंजी मदत जाहीर केलेली ज्यानुसार या मदती पोटी बागायतदारांना झाडाला प्रत्येकी जवळपास दोनशे वीस रुपये मिळणे आहे. मोहरलेल्या प्रत्येक आंबा व काजू झाडाची निगा राखण्यासाठी येणारा खर्च व मजुरी याची तुलना करता ही मदत फारच तुटपुंजी आहे. शासनाकडून झालेली मदत नाकारत आंबा बागायतदार यांनी 3 जुलै रोजी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांच्याकडून प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत स्पष्टता दिसून येत नसल्यामुळे उद्याच्या होणाऱे आंदोलन हे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प विरोधी देखील आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत व सरचिटणीस संदीप दळवी यांच्या सूचनेनुसार उद्या देवगड येथे होणाऱ्या आंदोलनास मनसेचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली आहे.
