उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक;आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. मधील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू करणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली
आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या आग्रही मागणीवरून व प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून त्यानुसार आडाळी एम.आय.डी.सी. मध्ये ज्या उद्योजकांनी भूखंड खरेदी केले होते, त्यांच्या भूखंड ताबा, करार व बांधकाम परवानगी इत्यादी बाबींवरील स्थगिती आता पूर्णपणे उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; तसेच नवीन इच्छुक उद्योजकांसाठी भूखंड घेण्याची ऑनलाईन प्रक्रिया पुढील दोन आठवड्यांत सुरू केली जाणार असून या परिसरातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याचा निर्णयही बैठकीत झाला. आडाळी एम.आय.डी.सी. मध्ये गुंतवणूक व उद्योग वाढावेत यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यात गोव्यात विशेष गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले जाणार आहे, तसेच मुख्य कार्यालय रत्नागिरी येथे असल्याने सिंधुदुर्गमधील उद्योजकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता दर गुरुवारी एम. आय.डी.सी.च्या विभागीय कार्यालयातील अधिकारी आडाळी येथेच कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध राहतील असा मोठा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, इन्सुली ते आडाळी या पर्यायी ३३ के व्ही वीज वाहिनीचे संथ गतीने चाललेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून, तिलारी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर करून ‘डाटा सेंटर’ सारखे उद्योग उभारण्याबाबत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या उच्चस्तरीय बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, एमआयडीसी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता, ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहिलेल्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सहसचिव आणि
प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते; दरम्यान, आपल्या आग्रही मागणीनुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तातडीने बैठक घेऊन आडाळी एम.आय.डी.सी. च्या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी मंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
