खासदार नारायणराव राणे
नवी दिल्ली (प्रतिनिधी)
परुळे चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रील पासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग-मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशी माहीती खा. नारायण राणे यांनी दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले होते. गेल्याच आठवड्यापासून सिंधुदुर्ग- पुणे विमान वाहतुक सुरुही झाली आहे.
गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरु असलेली सेवा बंद झाली होती. ही सेवा पुनः मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरु करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खा. नारायण राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्या यांकडे लक्ष वेधले होते. यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा सुविधा अपडेट करण्यात येत आहेत. यामुळे येत्या १८ एप्रील पासून लंबई-चिपी- मुंबई ही एअर अलायन्सची विमान सेवा होणार आहे. याबरोबरच इंडिगो या कंपनीची विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे.
