कणकवली नगरपरिषद निवडणूक; उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान मोठं नाट्य घडलं,कागदपत्रे अपुरी काही ठिकाणी नोंदणी नसलेली..

गरज पडल्यास आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोकू,कायदेशीर लढाईला भाजप तयार;समीर नलावडे

कणकवली प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर कणकवलीत उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान मोठं नाट्य घडलं आहे. अपूर्ण आणि चुकीची कागदपत्रं असतानाही विरोधकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आज केला.

अर्ज छाननीवेळी अनेक उमेदवारांची कागदपत्रं अपुरी, काही ठिकाणी नोंदणी नसलेली तर काही ठिकाणी जोडपत्रांचा अभाव असल्याचं स्पष्ट दिसून आलं. तरीदेखील हे अर्ज नियमबाह्यरीत्या स्वीकारले गेल्याचा आरोप नलावडे यांनी केला.

नलावडे म्हणाले, “उमेदवारी अर्ज सादर करताना परिपूर्ण कागदपत्रं जोडणे ही मूलभूत अट आहे. मात्र काही उमेदवारांनी तर निम्मी कागदपत्रंही योग्यरित्या जोडलेली नाहीत. अनेक ठिकाणी नोटरी नसल्यानं हे अर्ज सरळ फेटाळले जाणे अपेक्षित होतं. पण उलट त्यांना दोन तासांचा वेळ देऊन त्रुटी दुरुस्तीची संधी दिली गेली. ही प्रक्रिया नियमांच्या विरोधात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी करण्यासोबतच आता कायदेशीर लढाईलाही भाजप तयार असल्याचं नलावडे यांनी स्पष्ट केलं. “गरज पडल्यास आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहणं आवश्यक आहे,” असं ते म्हणाले. या वेळी अॅड. राजेंद्र रावराणे हे सुद्धा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page