कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेल्या आंबडपाल गावचे सुपुत्र अॅड. रजत चव्हाण यांना दैनिक नवराष्ट्रचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दैनिक नवभारत’ समूहाच्या ‘दैनिक नवराष्ट्र’ तर्फे कोकणच्या मातीतील रत्ने शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यातून आदर्शवाद जपणारे आणि समाजासाठी विशिष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती, उद्योजक तसेच संस्थांचा जाहीर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
अॅड. रजत चव्हाण हे विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. कुडाळ शहरातील एक प्रतिथयश वकील म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अवघ्या ३० वर्षांच्या तरुणाने केलेली कामगिरी इतर तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादाई आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून दैनिक नवराष्ट्रच्या माध्यमातून आदर्श समाजसेवक पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले.
