सतीश सावंत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
कणकवली प्रतिनिधी
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांबद्दल कोणतीही आस्था नाही, विधिमंडळात ऑनलाइन रमीचा डाव खेळून ते शेतमालाला नाही हमीभाव, शेतकऱ्यांनो खेळा रमीचा डाव असाच संदेश देत आहेत अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज केली.
श्री. सावंत म्हणाले, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, फळपिक विम्याचे पैसे दिले जात नाहीत, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत कृषीमंत्री सभागृहात बसून रम्मी खेळत असल्याने त्यातून शेतकऱ्यांनी देखील आपला उदरनिर्वाह रम्मी खेळून करावा, असा संदेश ते देत आहेत.
सावंत पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती कर्जमाफी, पीक विमा, हमीभाव – परंतु प्रत्यक्षात एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. सरकारमध्ये समन्वय नाही, शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. रम्मी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत प्रतिमेला धक्का बसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची छावा
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेतली. त्यानंतर छावा संघटनेतील शेतकऱ्यांच्या मुलांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोपही सावंत यांनी केला. या प्रकाराचा आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो असे श्री. सावंत म्हणाले
