माणगाव खोऱ्यात विजेचा लपंडाव आणि वारेमाप बिलांमुळे नागरिक त्रस्त
माणगाव (प्रतिनिधी)
माणगाव सब-स्टेशनमध्ये मे महिन्यापासून रिक्त असलेले शाखा अभियंत्याचे पद दोन दिवसांत कायमस्वरूपी भरले नाही, तर महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा आक्रमक इशारा पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी दिला आहे. महावितरण प्रशासनाचा भोंगळ कारभार, विजेचा लपंडाव आणि अदानी मीटरमुळे येणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे माणगाव खोऱ्यातील जनता त्रस्त झाली आहे.
माणगाव खोरे हा ग्रामीण आणि डोंगराळ भाग असून येथील वीज वाहिन्या मोठ्या प्रमाणावर जंगलातून गेल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात या वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या छाटणे (ट्री कटिंग) आणि देखभालीची (मेंटेनन्स) कामे केली जातात. मात्र, यावर्षी महावितरणने ट्री कटिंगचे कोणतेही नियोजन न केल्यामुळे सर्वत्र विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.
‘अदानी’ मीटरमुळे नागरिक त्रस्त
एकीकडे वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असताना, दुसरीकडे बसवण्यात आलेल्या नवीन ‘अदानी’ मीटरमुळे ग्राहकांना वारेमाप आणि अव्वासव्वा वीजबिले येत आहेत. यामुळे सामान्य ग्राहक आणि ग्रामस्थ त्रस्त झाले असून महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राजकीय टीका व आरोप
या समस्येवर बोलताना योगेश धुरी म्हणाले, “माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या काळात मे महिन्यातच ट्री कटिंग आणि मेंटेनन्सची कामे नियमित पूर्ण होत असत. त्यामुळे पावसाळ्यात विजेचा एवढा लपंडाव होत नसे. परंतु, आता या भागाला लोकप्रतिनिधीच नसल्यासारखी परिस्थिती आहे. केवळ निवडणुका आल्या की पैसे वाटायचे आणि मते मिळवायची, असा सत्ताधारी पक्षाचा फंडा बनला आहे. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न सोडवण्याकडे कोणालाही वेळ नाही.”
आंदोलनाचा इशारा
मे महिन्यापासून माणगाव शाखा अभियंत्याचे पद रिक्त असूनही महावितरण प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेत असले तरी आम्ही जनतेच्या हक्कासाठी कायम भांडत राहू, असा निर्धार धुरी यांनी व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत कायमस्वरूपी शाखा अभियंता हजर न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
