मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींशी चर्चा..
कणकवली प्रतिनिधी
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक ‘आंजिवडे-पाटगाव (भैरीची पाणंद) घाट रस्ता’ विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यासंदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही खासदार ना. नारायणराव राणे यांनी दिली.
वेंगुर्ले बंदर आंजिवडे पाटगाव कोल्हापूर घाट रस्ता कृती समिती’च्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथे खा. राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी समितीने या मार्गाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, हा रस्ता झाल्यास वेंगुर्ले-कोल्हापूर अंतर ४० ते ४५ किमीने कमी होईल आणि प्रवासाचे दोन तास वाचतील. केवळ ५ किमीचा हा घाट सुरक्षित आणि कमी वळणांचा असल्याने अवजड वाहतुकीसह मच्छीमार व्यवसाय आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. खासदार राणे यांनी या प्रकल्पाची गरज ओळखून सकारात्मक प्रतिसाद दिला, ज्यामुळे ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याप्रसंगी समितीचे कार्यकारी अध्यक्ष प्रभाकर परब, सचिव साईनाथ नार्वेकर, माजी उपसभापती आर. के. सावंत, आनंद मेस्त्री, खरात गुरुजी, अनिल वायंगणकर आदी उपस्थित होते.
