पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तलावांवर नव्यानेच नियुक्त सुरक्षा रक्षक 5 महिने पगाराच्या प्रतीक्षेत

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग व रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांवर आलीय उपासमारीची वेळ

दलालांच्या फायद्यासाठीच घाई गडबडीत नियुक्ती प्रक्रिया राबवली गेल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले..
स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप

कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तलावांवर नव्यानेच नियुक्त केलेले सुरक्षारक्षक चक्क 5 महिने पगाराच्या प्रतीक्षेत असुन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग व रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत तातडीने तोडगा न निघाल्यास सर्व सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबीयांना घेऊन पाटबंधारे विभागाच्या सिंधुदुर्गनगरी येथील तलावात बसून उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील 23 लघु पाटबंधारे प्रकल्पांसाठी 27 सुरक्षारक्षक माहे नोव्हेंबर 2023 मध्ये रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत नियुक्ती करण्यात आले होते.या नियुक्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे जिल्ह्यातील काही दलालांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केल्याच्या तक्रारीं संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत.यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ व दलालांनी मिळून घाईगडबडीत नियुक्त्या दिल्या गेल्या,ज्यामुळे आजमितीस निधीअभावी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे असा आरोप करत येत्या काळात सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती प्रक्रियेतील दलालांचा सुळसुळाट व त्यातून होणार भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा इशारा श्री गावडे यांनी दिला आहे. तर सर्व प्रशासकीय विभागांना कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सूचना देणाऱ्या कामगार विभागाच्या अत्यरित येणाऱ्या सुरक्षारक्षक मंडळाकडूनच वेतन प्रदान अधिनियमाचा भंग होत असल्याने गोरगरीब व कष्टकरी कामगारांनी न्याय तरी नक्की कुणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण झाला असून प्रसंगी कामगार न्यायालयात जाण्याचा इशारा स्वाभिमानी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page