माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांचे कुडाळ तहसीलदारांना निवेदन..
कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या कालावधीत झालेल्या नुकसानीची शासनाकडून देय असलेली नुकसान भरपाई अद्याप पूर्णपणे मिळालेली नसल्याने माणगाव खोरे परिसरातील शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रलंबित नुकसान भरपाईचे अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या वतीने कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, यंदाच्या २०२६ च्या कालावधीत आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार होती. मात्र, अद्यापपर्यंत अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली असली, तरी सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम तातडीने जमा करण्यात यावी, गणेश चतुर्थीपूर्वी प्रलंबित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माणगाव खोरे येथील शेतकरी बांधवांनी केली आहे.
